Sunday 28 May 2017

भाषा अभिमानाचे फुसके बार

माणसाला भाषा असतेच. ज्यांना ती नसते असे लोक आता दूर्मिळ झालेत. पण त्यांनाही चिन्हांची भाषा ही असतेच. भाषेशिवाय मानवी व्यवहाराचा पाया ढासळतो. आता ही भाषा एकतर आपल्याला आपण कोणत्या परिस्थितीत वाढतो त्यावरून तरी मिळते किंवा मग आपल्या आवडीनुसार आपण ती शिकून घेतो. यात एक भाषा असते मातृभाषा. आपल्याला ही जन्मजात लाभते आणि अपवाद वगळता आपण आपले आईबाप ज्या भाषेत बोलतात तिच भाषा बोलत असतो. या भाषेचा काही आपल्याला पर्याय नसतो. आपण आपल्या आईवडीलांना आधी वारंवार रितसर अर्ज करून काही ही भाषा मागून घेत नसतो की त्यासाठी काही कष्टही उपसलेले नसतात त्यामुळे या भाषेबाबत अभिमान बाळगण्याचं काही कारणच नाही. ज्यासाठी आपण काही मेहनत घेत नाही, जी भाषा आपल्याला केवळ योगायोगानं भेटलेली आहे तिच्याबाबतीत अभिमान बाळगावं असं काय आहे? पण तरीही तो अभिमान आपण बाळगतो. इतकंच नाही तर इतरांची भाषा कनिष्ठ आणि आपली भाषा तेवढी श्रेष्ठ हा अभिमानही त्यात मिसळलेला असतो. हे सारंच हास्यास्पद आहे. आपली मातृभाषा, मग ती जी काही असेल ती आपण शिकायलाच हवी, कारण त्यांतून आपण अधिक उत्तम पद्धतीनं विचार करू शकतो, इतरांशी संवाद साधू शकतो हा भाग आहेच पण ही बाब परिस्थितीवरही अवलंबून असते. उद्या एखादा मराठी माणूस आफ्रिकेत गेला, तिथंच राहिला तर शक्यता हीच आहे  की त्याची मुलं मराठीपेक्षा आफ्रिकन भाषा उत्तम पद्धतीने शिकेल आणि त्याच्यासाठी तेच योग्य राहील. व्यवहारात हेच घडताना दिसतं तरीही आपण भाषा अभिमानासारख्या गोष्टींमध्ये गुंतून राहतो. मराठी माणूस तसा दांभिकच म्हणायला पाहिजे. एकतर मराठीच्या नावानं बोलणारे  आपल्या भाषेबाबत किती आग्रही असतात हीच शंका आहे. आपल्या पोरांना मराठी शिकवण्यापेक्षा इंग्रजी शिकवण्याचा आग्रह धरणारे हेच लोक नसून सर्वसामान्य लोकही असतात कारण त्यांची साधी आशा असते की आपलं मुल इंग्रजी शिकलं तर त्याला पैसे कमावण्याच्या जास्त संधी मिळतील. यात चुकीचं काही नाही. चुकीचा आहे तो आपला अनाठायी आग्रह आणि लबाड भाषाभिमान. हा असला लबाडपणा करण्याऐवजी मुलांना हव्या त्या भाषा शिकू देणं, त्यासाठी प्रोत्साहित करणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. इंग्रजीच काय जमल्यास आणखीही एखादी भाषा शिकवण्यासाठी त्यांना मदत करा. पण त्याचबरोबर मराठी शिकवण्यासाठीही त्यांना प्रोत्साहित करा. पण त्यासाठी पालकांना प्रयत्न करावे लागतील. भाषेची गोडी लावण्यासाठी फार अवघड प्रयत्न करण्याची गरज नसते. रोजच्या जगण्यात हसतखेळत भाषा शिकता येते. त्यासाठी उगाच अभिमानाचा झेंडा नाचवण्याची गरज नसते. ते राजकारण्यांचं स्वार्थाचं राजकारण आहे. पण याचा अर्थ आपली जबाबदारी संपते असाही नाही. शेवटी मग ती मराठी असो, पंजाबी असो, हिब्रु असो, भाषा टिकवणं हे आपलं कर्तव्यच आहे. इस्त्रायली लोकांनी त्यांची हिब्रु भाषा मृतवत झाली असताना पुन्हा जीवंत केली. आपली भाषा काही मेलेली नाही. ती संकटातही नाही. पण त्या गैरसमजात राहूनही भागणार नाही. उलट ती आणखी सशक्त, आणखी जोमदार, आणखी जागतिक कशी बनेल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. उगाच मराठीच्या नावानं गळे काढण्यापेक्षा या गोष्टी केल्या तरच मराठी टिकेल आणि वाढेलही. 

No comments:

Post a Comment