ही पोस्ट मी पुन्हा टाकतोय व सर्वांशी शेअर करतोय. त्यावर काही विधान
करण्याआधी सर्वांना विनंती आहे की शांतपणे व कसलेही पूर्वग्रह मनात न ठेवता ही
पोस्ट वाचा. मुख्य म्हणजे याला स्त्री विरूद्ध पुरूष असा रंग कृपया देऊ नका. मी
दोघांनाही माणूसच मानतो व त्यामुळे त्यांच्यात बरेवाईट गुण असतात हेही मानतो.
मराठी साहित्य व्यवहाराचा मी एक साक्षीदार व सहभागी आहे. त्यातील एका गोष्टीवरील
ही माझी निरीक्षणे व अंदाज आहेत. ती योग्य व खरीच असतील किंवा असावीत असा काही
आग्रह नाही. त्यात तुमच्याकडून कमीजास्त योग्य भर अपेक्षित आहे. आणि चर्चा झालीच
तर ती एकांगी, पूर्वग्रहदूषित असू नये. यात कोणाला मोठं मानण्याचा किंवा कोणाला
कमी लेखण्याचा भाग नाहीय. एका वस्तूस्थितीकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. ती
तशी आहे किंवा नाही, यावर मतं अपेक्षित आहेत. ही पोस्ट लिहीताना मराठी समकालीन
तरुण स्त्री कादंबरीकार (ज्या सध्या आहेत)यांची मला माहिती नाही असं कोणी समजू
नये. त्यांपैकी अनेकांशी माझा परीचयही आहे. कोणाला खिजवण्यासाठी हे लिखाण केलेले
नाही.
- हारूकी मुराकामीचं ‘स्पुतनिक स्वीटहार्ट’ सध्या वाचतोय. त्यातली कथा नायिका ही लिखाणाचा
ध्यास घेतलेली व मुख्यतः कादंबरी लिहिण्यासाठी उत्सुक असलेली एक विशीतली मुलगी
आहे. हारूकीच्या अनेक पुस्तकातील कथानायिका या वाचनाची व लिखाणाची आवड असलेल्या
असतात. जपानमध्ये असलेली ही वास्तवता असेल असं यावरून मानायला हरकत नाही. जगातील
अन्य भाषांतही महिला आणि त्यातही तरुण मुली ज्या प्रमाणात साहित्यात समरस असतात,
त्या तुलनेत मराठीची स्थिती वाईटच दिसते. एक कवितेचा प्रकार सोडला तर अन्य साहित्य
प्रकारांत आणि साहित्य व्यवहारात स्त्रियांचं प्रमाण आणि त्यातही तरुण मुलींचं
प्रमाण नगण्यच दिसतं. कथा हा दुसरा प्रकार आहे ज्यात काही प्रमाणात काही जणी
आढळतात. कादंबरीचा विषय निघाला की मात्र हे प्रमाण फारच कमी होतं. कविता महाजन,
छाया महाजन, मोनिका गजेंद्रगडकर या काही महिला कादंबरीकारांची नावं इथं सांगता
येतील. पण हे अपवाद म्हणावेत असा हा प्रकार आहे. तरुण मुली एकूणच साहित्याकडे,
वाचनाकडे, लिखाणाकडे का वळत नाहीत?
माझी
काही निरीक्षणं व अंदाज आहेत.
- जगण्यातली मौज ज्या गोष्टीत आहे त्यात साहित्य
येत नाही असा यांचा समज असावा.
- साहित्य व्यवहार हे फक्त पुरूषांनीच करायच्या
गोष्टी आहेत असे त्यांच्यावरचे संस्कार.
- साहित्य हे काही करीअर होऊ शकत नाही, त्यामुळे
त्यात वेळ कशाला वाया घालवायचा हा विचार. मुली या फार व्यवहारी असतात असं म्हणतात.
- लिखाण आणि इथे कादंबरीचा विचार आहे म्हणून
त्याविषयी, हा प्रकार शारिरीक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या दमछाक करणारा आहे म्हणून
यात मुलींना (ज्या लिखाण करतात) फारसा रस नसतो.
- लिखाण, वाचन हे त्यांना ग्लॅमरस वाटत नाही
म्हणून. निदान जिथे मराठीचा संबंध येतो तिथे.
- लग्न हाच बहुतेकींच्या आयुष्यातला सर्वांत
महत्त्वाचा भाग असेल, ज्यात या गोष्टींना काही महत्त्व नसणे.
समाजातील अर्धी लोकसंख्या जर साहित्याविषयी इतकी उदासिन असेल तर
आपल्या सांस्कृतिक व्यवहारात साहित्याला मुख्य स्थान मिळणं जरा अवघडच आहे. आणि हे
तेव्हा, जेव्हा आपल्या इथे घरातली बाई, मग ती आई असेल किंवा पत्नी असेल, ही घरावर
प्रभाव टाकणारी असते असं मानलं जातं. अर्थात ते खरंही आहे. आपल्या एकंदरीत साहित्य
संस्कृतीतील ही महत्त्वाची बाब कायमच दूर्लक्षित राहिली आहे. इतकंच.
No comments:
Post a Comment