Thursday 22 February 2018

आपण का द्वेष करतो?


मी माणूस म्हणून जन्माला आलोय. जाणीवपूर्वक नाही तर निव्वळ योगायोगाने. मी यासाठी कोणतेही कष्ट घेतले नाहीत. कोणतीही इच्छा मनी धरली नव्हती. मी उंदराच्या किंवा गरुडाच्या किंवा गांडूळाच्या किंवा आंब्याच्या किंवा एखाद्या विषाणूच्या जन्मालाही आलो असतो किंवा मी मुळात जन्मालाच आलो नसतो. मग माणसाच्या जन्मात हा अहंकार कसा येऊन चिकटला मला? मी इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ कसा काय समजू लागलो? मी आज योगायोगानेच पुरष आहे, हिंदू आहे, भारतीय आहे, मराठी आहे पण मी इतर कोणीही असू शकलो असतो किंवा इतर कोठेही जन्माला येऊ शकलो असतो. मी पाकिस्तानी असू शकलो असतो किंवा आफ्रिकेतील एखाद्या अशा देशात जन्माला आलो असतो ज्याचं नावंही आज मला माहित नाही. मी बाईच्या जन्माला आलो असतो किंवा मी मुसलमान झालो असतो. मी दलित किंवा ब्राह्मण असू शकलो असतो. मी अपंग किंवा मतीमंद किंवा प्रतिभावंतही असू शकलो असतो किंवा नसतोही. मग जे केवळ योगायोगानं मिळालं आहे, जे मिळवण्यात आलेलं नाही त्याचा अभिमान मी का बाळगतो? मी स्वतःलाच योग्य, श्रेष्ठ किंवा तुच्छ का समजतो?मी त्यांच्यातलाही होऊ शकलो असतो आणि तसा झालो असतो तर कदाचीत मी तेव्हा, मी आज जो आहे त्याचा तिरस्कार केला असता. जे केवळ हास्यास्पद आहे, तकलादू आहे, त्यासाठी आम्ही सारेच का भांडतो? कशासाठी एकमेकांचा इतका द्वेष करतो? इतरांना अपमानीत करण्याची एकही संधी आम्ही वाया घालवत नाही. स्वतःला मिरवण्यासाठी आम्ही निर्लज्जपणे समर्थन करतो. का आणि कशासाठी?हे सारं किती काळ तर फक्त जोवर श्वास चालू आहे तोवरच ना? मी येण्याच्या आधी काही नव्हतं आणि मी गेल्यानंतर काही असणार नाही. हे काही गूढ रहस्य नाही. मग हा द्वेषभाव का आणि कशासाठी?