Monday 24 January 2011

स्वरसूर्य मौनस्थ जाहला



भीमसेन जोशी गेले. पण जातांना त्यांच्या कंठातली अमृतमयी स्वर संजीवनी समस्तांना देऊन गेले. गेली साठ वर्षं हा स्वरमेघ वर्षत होता, अविरत, ज्यात सचैल न्हाऊन निघत होते देशोदेशीचे स्वर-भूकेले रसिक, टिपत होते रंध्रारंध्रात ते चांदणस्वर अधीर, आतूर होऊन. हे आता पुन्हा होणे नाही. स्वर-पंढरीचा हा वारकरी आता त्याच्या माहेरी गेला आहे, कायमचा.
जग बदलणारी माणसं वेडी असतात. ती आधी स्वतः वेडी होतात आणि मग जगाला वेड लावतात. स्वरांचं वेड लागून छोटा भीमसेनही नकळत्या वयातंच घर सोडून स्वरांच्या शोधात दाहीदीशा भटकला. तपस्या एका जागी मांड ठोकूनच केली जावू शकत नाही, पायाला भिंगरी लावून, इतस्तत फिरत, ज्ञानकण वेचतही केली जाऊ शकते. स्वर तपस्या. कंठातून हवा तो स्वर, हवा तेव्हा निघण्याची किमया आणि तो स्वर डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येण्याची तपस्या. कठोर परिश्रमांती भीमसेनांनी ही किमया साध्य केलीच.
ह्या नशिबाच्या गोष्टी असतात का? असाव्यात. अन्यथा असलं सुरेल वेड प्रत्येकाला कुठं लागतं? आणि मग या वेडात सर्वांनाच सामील करून घेण्याचं त्यांचं कसब. जे त्यांच्या सोबत वेडे झाले ते धन्य झाले. हे सुख, हा मान आता इतरांना कधीच मिळणार नाही. एका काळाचा हा अस्त आहे.
आमचं भाग्य की आम्ही त्यांना पाहिलं, ऐकलं. ह्या आठवणीही अत्यंत गर्भश्रीमंत अशा आहेत. स्वर गंधानं पुनीत आहेत. आणि सुदैवानं त्यांना कधीच मरण असणार नाही. भीमसेनांचा पहाडी स्वर यानंतरही आमच्या ह्रदयात मेघगर्जनेसारखा घुमत राहील. त्यांच्या धीरगंभीर चपल बोल-ताना आणि वीजेसारखे कडाडते आलाप यापुढेही आम्हाला रोमांचीत करतील. कारण स्वरांना मरण नसतं. ते अमर असतात. आणि हे भाग्य ज्यांच्या हातून आमच्या भाळावर रेखलं गेलं त्या भीमसेनजींनाही आमच्या लेखी कधीही मरण नाही.

Monday 17 January 2011

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे काय म्हणावं काय तुमच्या या वागण्याला? आम्हाला तर काही कळेनासंच झालंय. कशावर कसं रीयक्ट व्हावं याचं काही ताळतंत्र आहे की नाही? अरे साधा कांदा तो काय आणि केवढी बोंबाबोंब सुरू आहे तुमची त्यावरून? त्याचा भाव काय वाढतो आणि त्यावर तुमचा थयथयाट काय सुरू होतो? हाच कांदा जेव्हा मातीमोल भावानं विकला जातो आणि शेतकरी वैतागानं, त्याला परवडत नसतानाही सारा कांदा फेकून देतो तेव्हा एकाला तरी आठवण येते का रे त्यांची? तेव्हा येते कोणाला चीड आणि रडतो का त्याच्यासाठी त्याच्यासोबत? तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही सरकारवर ओरडला नाही मग आज त्याच्याकडून तरी कशी अपेक्षा ठेवता की त्यानं तुमचा विचार करावा याची? आणि खरा दोष त्याचाही नाहीच आहे. ते मधले दलाल, साठेबाज, कावेबाज व्यापारी लुबाडतात त्याला आणि तुम्हालाही पण त्याच्याविरूद्ध तुमच्या तोंडातून ब्र ही फुटत नाही. का बुवा असं? की तो शेतकरी गरीब, असंघटीत आहे म्हणून त्याच्यावर चढायचं आणि ते व्यापारी श्रीमंत, संघटीत म्हणून त्यांच्यापुढं शेपूट घालायचं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
सोन्याचे भाव वाढले, चांदीचे भाव वाढले तेव्हा नाही राग आला तुम्हाला. मनात आनंदाच्या उकळ्याच फुटल्या उलट. कारण तुमच्या जवळंच ढीगभर सोनं होतं. मुलाच्या लग्नात आणखी ढीगभर मिळणारंच आहे. हुंडाबंदी गेली तेल लावत. तुम्हाला काय फरक पडतो? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
गाड्या महाग झाल्या, तरी गाडी घेण्याचा, चालवण्याचा सोस नाही कमी झाला. सायकल वापरावी, बसनं प्रवास करावा असं नाही कोणाला वाटलं कारण त्यानं तुमची प्रतिष्ठा डागाळते, तुमचं स्टेटस खराब होतं, मग भलेही शहरी वाहतुकीची आणि वातावरणाची वाट लागू दे. तुम्हाला कधीच काही वाटत नसतं. पण पेट्रोल महागलं की खच्चून बोंबाबोंब करायची एवढं बरं जमतं तुम्हाला. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून मारे तुम्ही सर्वांवर तोंडसुख घेता, यांचं यंव करावं त्यंव करांवं असले फुकट सल्ले देत बसता. पण आपलं काम व्हावं म्हणून लाचही देता, वशिल्यानं इतरांचा हक्क डावलून आपलं घोडं दामटवता, आणि तरीही काम नाही झालं की लगेच भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून पुन्हा ओरडत फिरता ते कोणत्या नैतिक अधिकारानं? हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
रस्त्यावरच्या भाजीवाल्याशी १-२ रूपयासाठी घासाघीस करता आणि कंपनी शोरूम्समध्ये विनातक्रार स्वतःला लुटू देता. फुटपाथवरले फेरीवाले जागा अडवतात म्हणून त्यांच्या मागे हात धुवून लागता आणि मोठाले बिल्डर्स मोठमोठाले भूखंड बळकावतात, खेळाची मैदानं घशात घालतात तेव्हा त्यांना तुम्ही जाब विचारत नाही. ट्रॅफीकला शिस्त नाही असं म्हणंतच तुम्हीही वनवेत गाडी घुसवता आणि ट्रॅफीक पोलिसानं पकडलं तर सरळ गुन्हा कबूल करण्याऐवजी फालतू कारणं सांगत हुज्जत घालता, मग पोलिसाला चिरीमिरी देऊन दंड टाळायला बघता , काम झालं की मित्रांमध्ये फुशारकी मारता आणि नाही झालं की पोलिस खात्याच्या तिर्थरूपांचा उद्धार करता. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
तुमची मोलकरीन एक दिवस नाही आली की तिला हवं ते बोलता, तिचा पगार कापता आणि ज्यांना चांगला राज्यकारभार करण्यासाठी तुम्ही निवडून दिलं ते राजकारणी वर्ष-वर्ष तुमच्या मतदारसंघात फिरकत नाही, फिरकले तरी तुमच्या समस्या ऐकून घेत नाही, तुमची कामं करत नाही, केली तर जी टिकत नाही , त्यांना मात्र कधी खडसावून दम देत नाही. उलट आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांचं लांगूलचालन करण्यात तुम्हाला कमीपणा वाटत नाही. हे तुमचं काही खरं नाही गड्यांनो!
अरे कधीतरी तुमच्या व इतरांच्याही हक्कांसाठी खमकी भूमिका घेऊन भांडा, राडेबाज राज-कारण्यांना चांगलं सत्ताकारण करण्यासाठी धमकवा, नाही ऐकलं तर घरी बसवा, कधीतरी आपल्या घराशिवाय, घरच्यांशिवाय गरजू, गरीब, असहाय लोकांचाही विचार करा, कधीतरी ‘मी’ न्याय्य मार्गानेच वागेन आणि इतरांनाही तसंच वागायला भाग पाडीन असा पवित्रा घ्या, कधीतरी भूकेल्याची भूक भागवा, तहानलेल्याची तहान शमवा, इतरांनाही जगायचं असतं, जे तुम्हाला हवंय, जी तुमची स्वप्ने असतात तीच इतरांचीही असतात ती पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा, कधीतरी माणूस म्हणून जगा आणि इतरांनाही जगू द्या. नाहीतर शेजारचं घर जळताना, शेजारचा माणूस लुटला, भरडला जाताना गप्प बसाल तर तुमच्यावरही ती वेळ आल्यावर सारे गप्प बसून तुमचा तमाशा बघतील. मग तुमचं काही खरं नाही गड्यांनो!

Monday 3 January 2011

ह्या पुतळ्यामागं दडलंय काय !

“ पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा , भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा...”...”कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ‘ ज्योतीराव ‘ या कवितेत असं लिहिलं असलं तरी सध्या एका पुतळ्यावरूनच महाराष्ट्राचं, विशेषतः पुण्यनगरीचं वातावरण मात्र ढवळून निघालंय. ‘ पुणे तिथे काय उणे ‘ ह्या उक्तीला जागूण आता पुण्यातही इतर शहरातली राडा संस्कृती अवतरली आहे. आणि ती ही इतक्या प्रभावीपणे की ह्याही बाबतीत पुण्याकडेच आपोआप याचं पुढारीपण चालून येणार याविषयी आमच्या तरी मनात काही एक शंका नाही. एका पुतळ्यापायी लोकं अकारणंच संतप्त होताहेत आणि नको त्या व्यवहारात उतरून इतरांच्याही डोक्याला नको तो संताप देताहेत.पुण्यात गेले काही दिवस ठाण मांडून बसलेली थंडीही ह्याच गरमागरम वातावरणामुळेच आपला गाशा गुंडाळून गेली असंही एका थोर पुणेरी संशोधकानं सखोल संशोधन करून सिद्ध केलंय. एका पुतळ्यावरून सुरू झालेला हा अस्मितेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. पण एवढा राडा होऊनही सर्व पक्षिय राडेबाज अत्यंत दुःखी असल्याचे आम्हाला कळले. त्याची कारणमिमांसा ढुंढाळता काही आंतल्या गोटातल्या बातम्या आमच्या कानावर पडल्या. ‘आपणा जे जे ठावे ते ते इतरांस सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन ’, ह्या रामदासोक्तीचे आम्ही एकनिष्ठ पाईक असल्याकारणाने आम्ही ताबडतोब त्या गोष्टी तुमच्या कानावर घालायला हजर झालो आहोत. आम्हास ज्या महत्वाच्या गोष्टी कळल्या त्या अशाः- १) महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी असूनही पुण्याचं नाव कुणाच्यातरी गेमपायी भलत्याच कारणासाठी गाजत असल्यानं, तिच्या चारित्र्यावरील हे डाग निपटून काढण्यासाठी, पुणे महानगरपालिकेतील सर्व पुणेहितचिंतक मंडळींनी एकत्र येऊन, स्वतःची बदनामी होईल याची पूर्ण कल्पना असूनही हे उदात्त कार्य केलं आहे. २) सतत वाढत्या भाववाढीनं त्रस्त सामान्य जनतेला कुठंतरी काहीतरी झपाट्यानं कमी होत आहे याचा आनंद व दिलासा मिळावा यासाठी अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण करण्याचा धाडशी निर्णय या खासमखास मंडळींनी केवळ आम जनतेच्या भलाईसाठी घेतला पण लोकांनी उगाच त्यांना नावं ठेवली. ३) तोडफोड केल्याबद्दल आपल्यालाच नुकसान भरपाई द्यावी लागेल याची कल्पना असतानाही केवळ लोकहितासाठीच या जनसेवकांनी बसेस फोडल्या, मग जाळल्या. आता तुम्ही म्हणाल यात लोकहित काय साधलं गेलं. तर मंडळी मुळात या सर्व बसेस आधीच कामातून गेल्या होत्या. या निमित्तानं त्या फोडल्या गेल्यानं आता निदान त्यांच्या जागी नविन बसेस तरी येतील म्हणजे पर्यायानं पुणेकरांचाच फायदा नाही का होणार ? पण आपली ही उदात्त भावना कोणीच समजून घेतली नाही याचं सर्वांनाच अत्यंत दुःख होतंय. सर्वाच्या लाडक्या आबांनीच सांगून ठेवलंय, “ बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी मोटी घटनाएँ होती रहती है. “ तरी पण लोकं काही त्यापासून शिकले नाही म्हणजे बघा. ४) महापालिकेत हैदोस घातला म्हणून सर्वांनी या गरीब गाईसारख्या सदस्यांना शिव्या घातल्या, अजूनही घालताहेत. पण त्यामागची त्यांची वैचारीक भूमिका मात्र कोणीच समजून घेतली नाही याचं सर्व सदस्यांना घोर आश्चर्य वाटतंय. महापौरांची खूर्चि तोडल्यानं महापौरांचा अवमान झाल्याचा आरोप यांच्यावर केला जातोय. पण ही खूर्चि जूनी झाली होती ती कधीही मोडली असती आणि त्यावरचे महापौरही खाली पडले असते तर ती केवढी नामुष्कीची बाब ठरली असती. म्हणून सर्व सदस्य , महापौरांना ती खूर्चि बदलायचा आग्रह धरला तर महापौरांनी त्यावर, आधीच मेट्रोचा खर्च वाढलाय त्यात आणखी हा खर्च कशाला म्हणत मोडता घालत होते. दोघांच्याही ह्या प्रेमळ आग्रहात अखेर हातातल्या खूर्चिचे बारा वाजले. पण त्यामुळे का होईना नव्या खूर्चिचा मार्ग प्रशस्त झालाय. पण हे मात्र कोणीच ऐकायला तयार नाही उलट नव्या खूर्चिला आता महापौरही नवा हवा अशी अफवा कोणीतरी सोडून दिलीय. म्हणजे बघा ! महापौरांचा राजदंड तोडला त्याचाही विपर्यास करण्यात आलाय. मुळात हा राजदंड राजेशाही व दंडूकेशाहीचं प्रच्छन्न रूप आहे आणि लोकशाहीत अशा गोष्टी कशा काय खपवून घ्यायच्या. म्हणून तोडला तो एवढंच. ५) आता हे सारं करायचं तर काही कारण असल्याशिवाय कसं करायचं म्हणून हा पुतळा मध्ये आणला गेला. पण त्यामागेही एक उदात्त ( पुन्हा ) हेतू होता. सध्या सर्वत्रच संशोधनाची भयंकर वानवा दिसत आहे. त्यातून आपल्या इतिहासाकडं तर सर्वाचाच दुर्लक्ष होतंय. आणि यात नव्या पुढीचं तर सर्वात जास्त प्रमाण आहे. ज्यांच्या खांद्यावर या देशाचं भवितव्य आहे त्यांनाच इतिहासाचं ज्ञान नाही ही किती भयंकर गोष्ट आहे बरं. कारण ज्याला इतिहास माहित नसतो त्याला इतिहास घडवताही येत नाही असं बाबासाहेबांनी सांगीतंलय. त्यामुळे या नव्या पिढीला बाबासाहेबांची ही शिकवण शिकवावी व त्यांना इतिहासाची गोडी वाटावी , तिकडे त्यांचं लक्ष जावं म्हणून सर्वानी हे ‘सुंदरकांड’ घडवलं. आता तुम्हीच बघा जो तो आपल्या इतिहासाबद्दल चर्चा करतोय. त्यातही यात दोन गट पडल्यानं नेमकं खरं काय याचा शोध घेण्यासाठी अनेकांनी इतिहास संशोधनास सुरूवातही केली आहे. त्यामुळे पुण्यात इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर संस्था आहेत तसेच कित्येक थोर इतिहास संशोधकही कार्यरत असल्याची माहिती सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आपल्या इतिहासाविषयी सारेच जन जागृत झाले आहेत. अन् याच उदात्त ( पुन्हा ) हेतूसाठी हा सर्व राडा जाणूनबुजून घालण्यात आला होता.यातून इतरही गोष्टी साध्य झाल्या आहेत. यावरची आमची निरीक्षणं अशी आहेत. पहिलं म्हणजे दादोजी हे एक अत्यंत चमत्कारी पुरूष आहेत. ह्या कर्नाटकवासी व कन्नड भाषी माणसासाठी आज आपले मराठी भाषिकच सीमावाद विसरून आपापसात भांडताहेत, हा केवढा मोठा चमत्कार आहे, नाही ? दुसरं म्हणजे कधी नव्हे ते राज आणि उद्धव यांचं किमान एका मुद्द्यावर तरी एकमत झालंय. त्यामुळे ते पुन्हा एकत्र यावेत यासाठी विनाकारण प्रयत्न करणारे पुन्हा आपले रिकामपणचे उद्योग सुरू करू शकतील. तिसरं म्हणजे महापालिकेचे कर्मचारी सुस्त असतात, कामचुकार असतात असे जे आरोप त्यांच्यावर केले जातात ते यानिमित्ताने फोल ठरलेत. ज्या तत्परतेनं त्यांनी दादोजींना ( पुतळ्याला ) कापलं आणि हलवलं त्यामुळे खुद्द दादोजीही आश्चर्यचकीत झाले असं आम्हास कळलं आहे. चौथं म्हणजे या प्रकरणात आपण लक्ष घालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय. सीडब्ल्युजी, टुजी, भाजी, कांदा भजी या जी जीनं आधीच जिकीरीस आलेलं सत्ताधीश सरकार या दादोजी प्रकरणात असं न वागतं तर नवल.पण ते काही असो या राड्यामुळं अनेक इतिहास संशोधक सतराव्या शतकातून पुन्हा एकविसाव्या शतकात परतले आणि ते अजून जिवंत असल्याचा लोकांना पुरावा मिळाला. त्यांनाही या निमित्तानं थोडीफार प्रसिद्धी मिळाली आहे. हे ही नसे थोडके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या निमित्तानं दादोजींना महापुरूष बनवण्याचं या सर्व इतिहासप्रेमी सर्वपक्षिय सदस्यांचं स्वप्नही एवितेवी पूर्ण झालं. कुसुमाग्रजांनी म्हटलंय,“ महापुरूष मरतात “ महापुरूष मरतात तेव्हा जागोजागचे संगमरवरी दगड जागे होतात आणि चौकातल्या शिल्पात त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात पुन्हा एकदा...बहुदा कायमचेच म्हणून – महापुरूषाला मरण असते दोनदा एकदा
शत्रूंकडून ....आणि नंतर भक्तांकडून...”
त्यामुळे बाकी काही होवो न होवो पण या राडा प्रकरणानं दादोजींवर आता महापुरूषाचा शिक्का बसलाय. कारण त्यांना आता शत्रूही आहेत आणि भक्तही.