मोदी सरकारनं तीन वर्षे पूर्ण केल्याचा प्रचंड
आनंद झालेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला अनेक
साक्षात्कार घडले. शहा कृपेने झालेल्या या शक्तिपात स्वरुपी साक्षात्कारांची
माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. तर भक्तगणांनो आमचा जन्म २०१४ साली झाली
असल्याचे आम्ही पुन्हा एकदा जाहिर करतो. आआधीची तारीख ही कॉंग्रेस नामे एका बिलंदर
पक्षाची निव्वळ धूळफेक होती हे आमच्या आता लक्षात आलं आहे. कारण शहाच म्हणतात की
गेल्या साठ वर्षांत या देशांत काहीच झालेलं नाही. २०१४ साली परम आदरणीय मोदीजी
सत्तेवर आले तेव्हाच्या आनंदात इंग्रजांनी या देशाला न मागताच स्वातंत्र्य बहाल
केलं. कॉंग्रेस आणि अन्य लोकांनी त्यासाठी जी लुटूपुटीची नाटकं केली ती आता
शहांच्या कृपेनं आम्हाला कळली आहेत. मोदी सत्तेवर आले म्हणून सर्व जगानं भारताला
जगाची महासत्ता म्हणून घोषित केलं. त्यांनीच आल्याआल्या प्राचीन भारतात, मोदी
कधीतरी सत्तेवर येतील म्हणून तेव्हांच्या ऋषीमुनींनी जे शोध लावले होते, ते पटापटा
प्रत्यक्षात साकारले गेले. वीज आली, रस्ते आले, अणुभट्ट्या आल्या, बस, रेल्वे आली,
इंटरनेट आली, अन्नधान्याची समृद्धी आली, इतंकच नव्हे तर सवासों करोड भारतीयही
गेल्या तीन वर्षांतच जन्माला आले. गेल्या तीन वर्षांत भारतानं जी प्रगती केली
त्यासाठी युरोप अमेरिकेला शेकडो वर्षे घासावी लागली होती. पण मोदींनी ते एका
चुटकीत करून दाखवलं. कॉग्रेसच्या खोटारड्या नेत्यांनी आम्हाला शाळेंत चुकीचा
इतिहास शिकवला, त्यासाठी आम्ही त्यांचा खमन ढोकळा खाऊन पोटभरून निषेध करीत आहोत.
No comments:
Post a Comment