Thursday, 25 May 2017

१- ससा आणि कासव

इसाप नीतित सांगितलेली ससा आणि कासव यांच्यातील शर्यतीची गोष्ट सर्वांनाच माहित असेल. लहानपणी ही गोष्ट ऐकायला मजा वाटते. पण मोठेपणीही तशी मजा येत असेल तर मात्र आपण केवळ वयानं, शरीरानं वाढलो, आपली बुद्धी अजून बालबुद्धीच आहे असं समजायला हरकत नाही. या कथेचं तात्पर्य सांगताना ससा आळशी होता म्हणून हरला आणि कासव मेहनती होता म्हणून जिंकला असं सांगण्यात येतात. व्यवहारात तसं कधीच होत नसतं. ससा एकवेळ कदाचित आपल्या आळसामुळे हरेलही पण तो नेहमीच हरणार नाही. कारण सारे ससे सर्वकाळ झोपत नाही. आणि कासवानं कितीही वेगानं धाव घेतली तरीही तो सशाला हरवू शकत नाही. कासवानं शर्यत जिंकली तरीही त्याला जो वेळ लागतो तो इतका मोठा असतो की त्याच्या या जिंकण्याला काहीच अर्थ उरत नाही. शंभर मिटरची शर्यत तुम्ही दोन तासांत पूर्ण केली म्हणून तुमचं कोणी कौतुक करणार आहे का? कोणीच करणार नाही. दुसरं म्हणजे मूळातच ही शर्यत विषम आहे. सशाची शर्यत एकतर दुस-या सशाशी किंवा हरिणाशी किंवा चित्त्याशी लावता येईल आणि कासवाची दुस-या कासवाशी किंवा गोगलगाईशी लावता येईल. ही कथा आळशी लोकांमध्ये थोडा उत्साह निर्माण करण्यासाठी आहे. त्यांना समाधान मिळावं यासाठी आहे. प्रत्यक्षात कासवासारखे मंद लोक कधीही सशासारख्या वेगवान लोकांना हरवू शकत नाही. तेव्हा अशा कथांवर विश्वास ठेवणं बंद करा. पण मग या कथेचा अर्थ काय घ्यायचा की त्याला अर्थच नाही? तसं नाही. या गोष्टीचं तात्पर्य हे की सशासारखे वेगवान व्हा आणि कासवासारखे टणक व्हा. कासवाची ताकद त्याच्या टणक कवचात आहे तर सशाची त्याच्या वेगात. या दोन्ही गोष्टी तुमच्या कामात येतील तेव्हा तुमची प्रगती अधिक वेगानं होईल आणि ती टिकूनही राहील. या कथेचा हाच खरा अर्थ आहे. 

No comments:

Post a Comment